‘विठ्ठल'च्या सेवानिवृत्त कामगारांना रक्कम देण्यास सुरुवात
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- वेणुनगर- गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने सेवानिवृत्त कामगारांच्या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या प्रलंबित रक्कमा अदा करण्यास सुरुवात केली आहे. चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याने कारखाना कार्यस्थळावर संबंधित कामगारांनी आनंद व्यक्त करून आभार मानले.
शासनाने श्री विठ्ठल साखर कारखान्याला ३४७ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यामध्ये कामगारांची देणी देण्यासाठी ४१ कोटी व व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात कारखान्याकडून सदर रक्कम संबंधितांना देण्यास विलंब झाला. त्यामुळे किरण घोडके यांच्यासह सेवानिवृत्त कामगारांनी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण
सुरू केले. यादरम्यान, आ. अभिजित पाटील यांनी प्रवीण भोसले, संजय पाटील आदी आपल्या सहकाऱ्यांना आंदोलनस्थळी पाठवून सर्वांशी सुसंवाद साधला. त्यानुसार आठ दिवसांच्या उपोषणानंतर यशस्वी तोडगा निघाला आणि या कामगारांनी उपोषण सोडले.
कारखान्याने सेवानिवृत्त कामगारांना याअगोदर २५ टक्के रक्कम अदा केलेली असून आता पुणे येथे चर्चेअंती झालेली तडजोडीनुसार ५० टक्के रक्कम अदा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांनी दिले असल्याचे कामगारांनी सांगितले.
आमदार अभिजीत पाटील यांनी कारखाना निवडणुकीत पॅनल उभा केल्यावर शेतकरी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार व व्यापाऱ्यांची देणी देण्यात येतील, असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी तो शब्द पाळला असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे येथे उपोषणास बसलेल्या इतरही कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे. आपली रक्कम घेऊन जावी, असे आवाहन या कामगारांनी केले आहे.
0 Comments