माळीनगर येथे २५ वर्षांनी भरला शालेय मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळीनगर येथील दि सासवड माळी एज्यूकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल विविधांगी हायस्कूल मधील २००१ बॅच मधील १० वी च्या माजी विद्यार्थ्यांचा 25 वर्षानंतर स्नेह मेळावा (गेट टुगेदर) रविवार दि. २५ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी सुमारे ३५ मुले आणि ३० मुली अशा तब्बल ६५ माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.यावेळी विद्यार्थ्यांना प्राचार्य बिराजदार यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. त्याचवेळी कार्यक्रमासाठी प्रशालेच्या ४ माजी प्राचार्यांना निमंत्रित केले होते यात सौ.ए. व्ही.कुलकर्णी ,डी.एस. देशपांडे,के.बी.कुलकर्णी आणि पी.सी.चौरे उपस्थित होते.त्याच बरोबर विषय शिक्षक आर.सी.वाघमारे,कल्याण कापरे,कोळी आणि राजेश कांबळे हे देखील उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत शाळेच्या प्रांगणात शिक्षकांच्या हस्ते पर्यावरण पूरक वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली नंतर अगदी शालेय जीवनाप्रमाणे घंटा वाजवली आणि वर्गात माजी विद्यार्थ्यांनी प्रवेश केला व २५ वर्षांनी पुन्हा १० वी च्या त्याच वर्गात त्याच बाकावर बसण्याचा अनुभव घेतला.नंतर उपस्थितांची हजेरी घेण्यात आली सर्व शिक्षकांचा झाडाचे रोप आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. नंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला आणि मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर प्राचार्य आणि माजी प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या गरीब मुलांना मदत म्हणुन वह्या आणि शालेय साहित्य बिराजदार सर यांचेकडे सुपूर्द केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्निल निकम,सौ.अश्विनी राऊत-गिरमे,अनिल जाधव यांनी केले, जाधव यांचा एस.आर.पी. एफ.सोलापूरमधील सेवेसाठी सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिण यांच्या तर्फे विशेष सत्कार देखील करण्यात आला.
पश्चात सर्व उपस्थीत शिक्षक आणि विद्यार्थी याच्यासाठी चेहिता हॉटेल अकलूजमध्ये स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.तिथेच नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले आणि कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली.अखेरीस सर्वांनी हलगीच्या ठेक्यावर कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि भावूक अंतकरणाने पुन्हा भेटण्याचा निश्चय करून एकमेकांचा निरोप घेतला सदर कार्यक्रमासाठी अमित कांबळे, श्रेयस राऊत,यशवंत (अतुल) राऊत,स्वप्निल निकम,अनिल जाधव,अश्विनी राऊत- गिरमे, पूनम राजपुरे- तावरे,अनुराधा कोरे- मनगिरे,शबाना काझी आणि समिना शेख यांनी २ महिने आधीपासून या कार्यक्रमाचे नियोजन केले. अखेरीस श्रेयस राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments