ई-नाममुळे विक्री व्यवहारात शेतक-यांना मोठा आर्थिक फायदा- रंगनाथ कटरे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या नविन धोरणानुसार राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) या प्रणालीमुळे शेतक-याना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार असून शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याची माहिती कृषि मंत्रालय, भारत सरकारचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या नविन धोरणानुसार राष्ट्रीय कृषि बाजार म्हणजे ई-नाम या योजनेमध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती, अकलूज या बाजार समितीचा समावेश झाल्याबद्दल सदर प्रणालीची माहिती व अंमलबजावणी होण्यासाठी शुक्रवारी बाजार समितीचे MACP गोडावूनमध्ये शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, तोलार, शेतकरी कंपनी पदाधिकारी, बाजार समिती कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
कटरे म्हणाले की, ई-नाममुळे शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळणे व विक्री झालेल्या मालाचे तात्काळ पैसे बँक खात्यात जमा होणे तसेच राज्यातील इतर बाजार समितीत नोंद असणारे खरेदीदार व्यापा-यांना बोली लावणे शक्य होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले की , या प्रणाली अंतर्गत व्यवहारामुळे शेतक-यांना रकमेबद्दल सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी शेतक-यांनी बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे.
शेतक-यांच्या शेतमाल खरेदी- विक्रीसंबंधी सध्याचे व्यवहार व त्यामधून होत असलेले संभाव्य धोके नुकसान लक्षात घेता शेतक-यांच्या फायद्यासाठी शेतकरी व व्यापा-यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संचालक आनंद फडे, उध्दव डांगरे, शेतकरी, व्यापारी, बाजार समिती कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन उपसचिव दिनेश माने-देशमुख यांनी मानले व सुत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले.
0 Comments