पावसामुळे उमराणी बंधारा तुडुंब भरला; सोलापूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला आहे. यात सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात रेकॉर्डब्रेक पाऊस पडला आहे. यामुळे भीमा नदीवरील महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर लवंगी- सादेपूर दरम्यान कर्नाटक सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित उमराणी बंधारा बांधला आहे.
हा बंधारा तुडुंब भरला आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात काही भागात आज पुन्हा जोरदार पाऊस झाला.
राज्यात यंदा अवकाळी पावसाने हाहाकार माजविला होता. काही भागात तर अगदी मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे उमराणी बंधारा मे महिन्यातच तुडुंब भरून ओसंडून वाहू लागला आहे. तब्बल १३३ कोटी खर्च करून बंधारा बांधण्यात आला असून पाऊण टीएमसी पाण्याची साठवण क्षमता याची आहे. ३० फुट उंचीचा हा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे १० हजार १२० एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे.
अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुकात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किरनाळी गावांना पावसाने झोडपले आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे - नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेतशिवारात देखील पाणी शिरले आहे.
नुकसानीचे पंचनामे सुरु
दरम्यान बार्शी तालुक्यातील साकत येथे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नदीच्या गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. निलकंठा नदीच्या पाण्यातून कसरत करत मार्ग काढत काढत पाण्यातून नदी पार करत आहेत. बार्शी तालुक्यातील साकत ते घाणेगाव गावाला गेल्या दोन वर्षापासून नदीवरील पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात त्रास होत असतो.
0 Comments