अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- यंदा सोलापूर जिल्ह्यात पावसाने मे महिन्यात सुरुवात केली आहे. हा पाऊस गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओलावा झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील काही भागात रविवारी पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, काही कृषितज्ज्ञांनी पेरणीसाठी घाई न करण्याचे आवाहन केले आहे.
यंदाच्या उन्हाने सगळ्यांची त्रेधा उडवलेली होती. शेतकऱ्यांना पिकांसाठी तसेच जनावरांना पाण्याकरिता अनेक अडचणीचा सामना करावा लागत असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा हाहाकार झाला. अवकाळी मोठ्या प्रमाणात बरसल्याने वातावरणात थोडासा थंडावा जरी असला, तरी उकाडा कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने तालुक्यातील शेतकऱ्याकडून खरीप पेरणीची लगबग सुरु केलेली आहे. तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकरी सत्तार शेख यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांच्या शेतात उडीद पिकांची पेरणी केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली असताना तालुक्यातील अनेक भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. बासलेगांवातील शेतकरी शेख यांच्या शेतात पेरणी करत असताना शेतकरी मल्लप्पा बिराजदार, रामण्णा भंडारे, राजू भाई शेख, फैजा शेख, अल्फेज शेख, संतोष संकपाळ हे उपस्थित होते.
0 Comments