29 जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतुने रविवार दि. 29 जून 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. ढोर समाजाचे महामेरू भारताचे माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार असून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर तसेच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी मोठ्यासंख्येने या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावणारे संत वीर कक्कय्या महाराज यांच्या विचारावर चालताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्वाभिमानाने ढोर समाज वाटचाल करत आहे. नेहमी संघर्ष करणारा ढोर समाज कायम मागासलेलाच राहिला आहे. त्यातच देशातील नवीन शैक्षणिक पध्दती आणि अनुसुचित जाती मधील आरक्षण वर्गीकरण पध्दतीमुळे समाजातील विद्यार्थी आणि तरूणांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. यामुळे शिक्षण आणि नोकर्यांच्या वाटा रोखणार्या ठरणार आहेत. या नव्या धोरणामुळे ढोर समाजातील तरूण विद्यार्थी यांच्यावर अन्याय होणार आहे. खाजगीकरणामुळे समाजातील तरूणांच्या बेकारांची संख्या मोठी वाढत आहे. ढोर समाजातील तरूणांपुढे आगामी काळात मोठे संकट उभे राहणार आहे. कातडी कमावणे हा पारंपारिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा ढोर समाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागासलेलाच होण्याच्या मार्गावर आहे. अनुसुचित जाती मधील आरक्षण वर्गीकरणामध्ये ढोर समाजाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. शासनाने घोषित केलेले कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. सरकारला जागे करण्यासाठी समाज एकटवून सरकारपुढे समाजाची व्यथा या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी आमदार विठ्ठल कटकधोंड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महाराष्ट्रासह देशातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने समाजाच्या अडचणी मांडण्यात येणार आहेत त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे, सोमनपाचे निवृत्त अधिकारी सच्चिदानंद व्हटकर, संगीत जोगधनकर आदि उपस्थित होते.
0 Comments