दादांनी दिला १० हजारांचा वादा! ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना आर्थिक मदत
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान, काहींच्या घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील अनेक गावांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे.
यावेळी राज्य प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून, काही भागांमध्ये पंचनाम्याला सुरुवातही झाली आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच ज्यांचे पावसामुळे नुकसान झालंय त्यांना १० हजार रूपये देण्याची घोषणा केली.
अजित पवारांचा दौरा
आज अजित पवारांनी स्वतः बारामतीतील पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांची पाहणी केली. सिद्धेश्वर निंबुडी या गावात त्यांनी वाहून गेलेले रस्ते, कोसळलेली घरं, तुटलेले ब्रीज, वीज खांब अशा ठिकाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
आर्थिक मदतीची घोषणा
नुकसान झालेल्या कुटुंबाना दिलासा देत अजित पवार म्हणाले, गावातील नुकसानीचे पंचनामे उरकल्यानंतर, धान्य द्यायला सुरूवात केली आहे. आता ज्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. त्यांना लवकरच १० हजारांची आर्थिक मदत देणार, असं म्हणत त्यांनी कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, निकष काय असतील, कोण पात्र ठरेल याबाबतची यादी लवकरच प्रशासनाकडून जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
निरा कालवा फुटला, ढेकळवाडीत पूरस्थिती
बारामती तालुक्यात तीन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निरा कालवा फुटला आहे. यामुळे ढेकळवाडी, काटेवाडी रस्ता बंद झाला असून, परिसरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. साखरेवाडा व विजयनगर परिसरातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
0 Comments