एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसाठी रचला चक्रव्यूह !
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्यात सर्वाधिक पाठींबा उद्धव ठाकरेंना कुठे मिळाला असेल तर तो मुंबईमध्ये. शिवसेनेतील फूटीनंतर मुंबईतील शिवसैनिक ठाकरेंसोबत कायम राहिला. उद्धव ठाकरेंची खरी ताकद आजही मुंबईमध्येच आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदेंनी ठाकरेंचे मुंबईतील शिलेदार फोडण्यास सुरुवात केली आहे. शिलेदार फोडून संघटनात्मक ताकदीवरच वार करण्याचा प्लॅन शिंदेंचा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीला आणखी आठ महिन्यांचा कालावधी असताना त्यांनी ठाकरेंच्या पक्षातून आपल्या पक्षात इन्कमिंग वाढवले आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत नुकतेच मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता साळवी यांनी प्रवेश केला. साळवींचा प्रवेश हा ठाकरेंसाठी मोठा थक्का मानला जातो आहे. त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्यापक्षासोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आत्तापर्यंत तब्बल 45 ते 50 नगरसेवक आल्याचे जाहीर केले आहे. महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंचे पक्ष संघटन दुबळे करण्याचा शिंदेचा प्लॅन आहे.
'मिशन टायगर' द्वारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतले. आता, शिंदेची नजर ही माजी नगरसेवक आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत शिंदेनी ताकद दिली. तर नवी मुंबई महापालिकेची तब्बल 13 माजी नगरसेवकांना शिंदेंनी आपल्या सोबत घेतले. यातील बहुतांश नगरसेवक है शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंसोबत राहिले होते.
मुंबई महापालिका हा दोन्ही ठाकरे बंधुंच्या दृष्टिने अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईत त्यांचे पारडे जड होईल आणि मराठी मतदार उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून राज-उद्धव यांच्या युतीचा काहीच उपयोग होणार नाही आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसेल, अशी रणनीती शिंदेनी आत्तापासूनच आखण्यास सुरुवात केली आहे.
0 Comments