सांगोला तालुक्यात रिपरिप ; पावसाने जनजीवन विस्कळीत
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून दिवस व रात्रभर थांबून
मान्सूनपूर्व रिपरिप पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बहुतांश नागरिकांनी घरात थांबणे पसंत केले आहे.सांगोला शहरात भुयारी गटारीचे काम सर्व गल्लीबोळात सुरू असल्याने रस्ते खड्डेमय चिखलयुक्त झाले आहेत. दिवसभर रिपरिप पावसामुळे घसरगुंडी तयार झाली आहे. अनेक नागरिकांनी दुचाकी वाहने घरापासून ज्या ठिकाणी कठीण खडक आहेत.तेथेच रस्त्यावर लावून चालत घरी जाणे पसंत केले. ग्रामीण भागात थांबून थांबून दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले आहे. काही नागरिकांनी घरात अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, प्लास्टिक टोप्या, रेनकोट काढून पावसातच फेरफटका मारत असल्याचे दृश्य होते. पाऊस झाला असला, तरीही शेतकरी मृगावरच पेरणी करण्याच्या विचारात आहे. गेली आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच पावसाळ्यात पाऊस होतो का नाही,अशी भीती व्यक्त करत आहेत. पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत. जनावरांना वैरणही खाता येत नाही. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणी अगोदरच्या मशागती रखडल्या आहेत. तर गवताचे प्रमाण वाढणार असल्याने त्याचबरोबर हा पाऊस कधी उघडेल, हे सांगता येत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
0 Comments