अक्कलकोट बाजारामध्ये पालेभाज्यांचे दर वाढले
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- कांदा बाजारातील आवारात भरणाऱ्या भाजीपाला लिलावामध्ये मेथी, पालक आणि कोथिंबिरीच्या बाजारभावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
सध्या उन्हाळा शेवटच्या टप्प्यात आहे. कडक उन्हामुळे भाजीपाला हाती लागणे जिकीरीचे काम आहे. तरी सुद्धा जेमतेम पाण्यावर काही शेतकऱ्यांनी नाजूक पीक असलेला भाजीपाला काढण्यात यश मिळविले. मात्र आजवर अपेक्षित दर मिळत नव्हता. यावर अनेक शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा चालतो.
सध्या मेथीची एक जुडी १५ रुपयांना तर कोथिंबिरीची जुडी १५ ते २० आणि पालक सुध्दा १५ रुपयांना पेंडी विकली गेल्याची माहिती व्यापारी सैपन बागवान व शेतकरी अनिल पवार (निमगाव) यांनी दिली. भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार दररोज सकाळी साडेपाच ते सहा वाजता सुरू होत असतो. सदरची
भाववाढ गेल्या चार दिवसांपासून टिकून राहिली आहे. तालुक्यातील विविध भागातील बहुतेक शेतकरी त्यांचा भाजीपाला आता या बाजाराच्या आवारात विक्रीसाठी आणत असून त्यामुळे उलाढाल वाढली आहे. मान्सून पूर्व व अवकाळी पावसामुळे शेतातील भाजीपाला काढणे अवघड आहे. म्हणून आवक कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत.
तालुक्यातील अक्कलकोट परिसरासह जेऊर, निमगाव, दहिटणेवाडी, चपळगाववाडी, कल्लप्पावाडी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव, दिंडूर येथील शेतकऱ्यांनी कोथिंबीर व मेथी ची लागवड केली आहे. सध्या पावसामुळे बाजारात आवक कमी असल्याने दर वाढत आहेत. यामुळे या भाजीपाला लिलाव मार्केटमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
सुविधांचा अभाव
येथील बाजारात स्वच्छता दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृहाची सुध्दा सोय नाही. लांब पल्ल्यांवरुन आलेल्यांना सुलभ शौचालय व पाण्याच्या बाटलीसाठी पैसे मोजावे लागत आहेत. म्हणून या ठिकाणी असलेले घाणीचे साम्राज्य नाहीसे करण्याबरोबरच सुसज्ज मुतारी व सुलभ शौचालय बांधून देण्याची मागणी शेतकरी व व्यापारी वर्गातून होत आहे.
0 Comments