नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा - कृषी मंत्री कोकाटे
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मान्सूनपूर्व पाऊस पडत असल्याने फळबागांचे व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करावा अशा सूचना कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिल्या.
मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान झालेल्या पद्माकर बागल, कोर्टी (ता. पंढरपूर) यांच्या कलिंगड पिकाची पाहणी कृषिमंत्री श्री कोकाटे यांनी पाहणी केली. यावेळी मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी श्री बागल यांच्या कलिंगड प्लॉट संबंधी लागवडीपासून ते आत्तापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती घेतली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील अशी कृषिमंत्री श्री कोकाटे यांनी ग्वाही दिली.
यावेळी पंढरपूर तालुक्यात मे महिन्यातील सरासरी पाऊस 20 मी.मी एवढा आहे परंतु आज अखेर 138 मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याने तालुक्यातील 115 शेतकऱ्याची 65.99 हेक्टर क्षेत्र वरील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी दिली.
तसेच बागल यांनी कृषिमंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आल्याचे समाधान व्यक्त करून सदर कलिंगड प्लॉट पाऊस चालू होण्यापूर्वी 13 रुपये प्रति किलो प्रमाणे व्यापाऱ्याकडून मागणी झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले परंतु सततच्या अवकाळी पावसामुळे सदर प्लॉट सध्या परिस्थितीमध्ये 2 रुपये प्रति किलो एवढ्या कमी दराने मागण्यात येत असल्याचे सांगितले. तरी शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी केली.
सदर पाहणी दौऱ्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत बागल,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे , चंद्रकांत बागल, दत्तात्रय बागल, सुभाष बागल, अण्णा फाटे, अतुल फाटे आदी उपस्थित होते.
0 Comments