उजाड माळरानावरील आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग हा राज्यासाठी दिशादर्शक ठरेल- कृषी मंत्री कोकाटे
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी त्यांच्या पडीक व हलक्या माळरान जमिनीवर आंबा फळबाग फुलवलेली आहे. तसेच या बागेत आंब्याच्या 17 जाती असून आंब्याची 17 कलमे एकाच झाडावर घेतली आहेत. याच ठिकाणी तीन किलो वजनाचा शरद व दोन किलो वजनाचा सावता अंबा विकसित केलेला आहे. या अंबा बागेचे व दत्तात्रय घाडगे यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करून कारण च्या महाराणावरील अरांच्या माळरानावरील अंबा लागवडीचा हा यशस्वी प्रयोग राज्यातील इतर हलक्या उपळीक जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी पथदर्शक व मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी करून माहिती घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी ईशादीन शेळकंदे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय घाडगे, बालाजी गाडेकर व इतर सर्व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी मंत्री कोकाटे पुढे म्हणाले की, अरण च्या या उजाड माळरानावर आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग हा महाराष्ट्रातील पडीक, हलक्या व माळरान असलेल्या 20 ते 25 टक्के क्षेत्राकरिता दिशादर्शक व मार्गदर्शक ठरेल व हे क्षेत्र फळपीक लागवडीखाली आणता येईल. त्यामुळे राज्याचे फळपीक उत्पादन वाढेल व असे शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील, असे त्यांनी सांगितले.
स्मार्ट प्रकल्पाला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवणार -
माढा तालुक्यातील मौजे अरण येथील शेतकरी बालाजी गाडेकर यांनी स्थापन केलेल्या समुल शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली. येथे विविध प्रकारच्या डाळी व भाजीपाला यांच्या ग्रेडिंग अँड सॉर्टिंग चा 10 कोटीचा प्रकल्प उभा केला असून स्मार्ट प्रकल्पांतर्गत त्यांना पाच कोटीच्या मर्यादित 60 टक्के प्रमाणे 3 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे जास्तीत जास्त फळे व भाजीपाला निर्यातीसाठी मदत होऊन यात चांगली वाढ होईल व शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा विश्वास कृषिमंत्री कोकाटे यांनी व्यक्त करून स्मार्ट प्रकल्पाला मुदतवाढ मिळण्यासाठी जागतिक बँकेला प्रस्ताव देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यानंतर बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी निवड पद्धतीने तयार केलेल्या प्रवीण भगवा व प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या डाळिंब बागेत भेट दिली. शेतकरी प्रवीण माने यांच्या एक खोड तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती घेतली यामध्ये येणारा खर्च येणारे उत्पादन व उत्पादन खर्चातील बचत या बाबीवर सविस्तर चर्चा केली.
यानंतर दुष्काळी भागात टंचाईच्या काळात फळबागे करता उपयुक्त अशा सीआरए( climate resilent agriculture) या प्रात्यक्षिकाची पाहणी केली व हे तंत्रज्ञान दुष्काळी भागात उपयुक्त असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील फळबाग लागवडीची माहिती दिली. तसेच खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तयारीचीही त्यांनी माहिती दिली.
पडत्या पावसात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते तसेच त्यांनी शेतात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती उत्सुकतेने जाणून घेत होते. तसेच त्यांच्या प्रयोगाचे कौतुक करून माळरान वरील अंबा फळबाग हा प्रयोग राज्यातील अन्य ठिकाणच्या अशा जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरीही कृषिमंत्री भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन माहिती घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत होते.
0 Comments