वाशिंबेत राजकिय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी;आज संध्याकाळी कॅन्डल मोर्चाचे आयोजन
वाशिंबे(कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जोपर्यंत दिले जात नाही,तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे मंगळवार दि.३१ रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला गेला आहे. याबाबत करमाळा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
यानंतर गुरूवार दि.२ रोजी शासनाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने "एक मराठा... लाख मराठा" अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर परिसर दणाणून गेला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसलेल्या असणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने ४० दिवसांत निर्णय होईल असा शब्द दिला होता. मात्र सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. शिवाय त्यांनी पाणी सुद्धा वर्ज्य केले आहे. तरीही सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आतापर्यंत राज्यभरातून शांततेत होणारी आंदोलने आता उग्र स्वरूप धारण करु लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर वाशिंबे ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करून मोर्चा काढण्यात आला.तर आज संध्याकाळी सरकारचा निषेधार्थ कॅन्डल मोर्चाचे आयोजन करत सकल मराठा समाज वाशिंबे यांच्यावतीने गावातील सर्वांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
0 Comments