आरक्षणासाठी सोलापूरचे कार्यकर्ते दिल्लीत;
'जंतर-मंतर 'वर वनवासी वेशात आंदोलन
जनहित शेतकरी संघटना : ताब्यात घेऊन सोडून दिले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून महाराष्ट्र पेटला आहे. या आंदोलनाकडे त्वरित लक्ष देऊन आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या आणि महाराष्ट्रातील स्थिती शांत करा, या मागणीसाठी राष्ट्रीय जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी आंदोलनकेले. या आंदोलकांची बुधवारी पोलिसांनी भेट घेऊन सरकारी प्रतिनिधींची भेट घालून देऊ असे आश्वासन दिल्याचे संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, महाराष्ट्रातील स्थितीकडे केंद्र सरकार बघायला तयार नाही. महाराष्ट्रात जाळपोळ सुरू आहे. याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मंगळवारी दिल्लीत पोहोचलो. वनवासी वेशात दिवसभर जंतर-मंतरवर आंदोलन केले. सकाळी १० वाजता आंदोलनाला बसलो होतो. सायंकाळी पाच वाजता दिल्ली पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणले. तिथे जबाब घेतला. जंतर-मंतर मैदानावर एक दिवसाहून अधिक काळ आंदोलन करण्यास परवानगी नाही. त्यामुळे आम्ही आता आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात चंदू निकम, बंटी वहाडे, नाना मोरे, ज्ञानेश्वर भोसले, सुरेश नवले, पिंटू पवार, माउली खरात, गोवर्धन घोलप, मोहन जमदाडे यांचा समावेश आहे.
0 Comments