वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य,
रस्ता सुरक्षा अभियान लोकचळवळ व्हावी
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे 34 व्या रस्ते सुरक्षा अभियान 2023 चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक असून, वाहतूक नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे. वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, रस्ता सुरक्षा अभियान हे सप्ताहापुरतेच मर्यादित न राहता लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज येथे केले.
34 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम मंडळ, परिवहन विभाग, शहर व ग्रामीण पोलीस विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत असून, ते 17 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
नियोजन भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हिंमतराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर आणि अमरसिंह गवारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे श्री. चिटणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ठाकरे, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले व्यासपाठीवर उपस्थित होते.
अपघातामुळे जीवितहानी होण्याबरोबरच संबंधित कुटुंबावरही परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मनिषा आव्हाळे म्हणाल्या, वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, या माध्यमातून नागरिकांकडून रस्ते सुरक्षा अभियान वर्षभर राबवले गेले पाहिजे. अपघात कमी करण्यासाठी उपस्थित युवा वर्गाने कुटुंबात, समाजात वाहतूक नियमांचा प्रसार करणारे दूत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
1 नोव्हेंबरपासून ऊस ट्रॅक्टरच्या ट्रेलरला रेडियम लावण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे गेल्या अडीच महिन्यात यासंदर्भातील एकाही अपघाताची नोंद झाली नाही, असे सांगून हिंमतराव जाधव म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात सन 2021 मध्ये रस्ते अपघातातील मृतांची संख्या 616 असून, 2022 मध्ये ही संख्या 702 पर्यंत वाढली आहे. याचा परिणाम मृत व्यक्तिच्या कुटुंबावरही होतो. मागील वर्षी देशभरात 1 लाख 55 हजार 622 जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले असून पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धातील बळींपेक्षा ही संख्या जास्त आहे. याचे गांभीर्य ओळखून वाहतूक नियमाचे पालन व्हावे. युवा वर्गात बदल घडविण्याची ताकद असून, याबाबत त्यांनी अधिक दक्ष राहावे. रस्ते अपघातातील मानवी चुका आपण कमी करू शकतो. जनतेचे सहकार्य मिळाल्याशिवाय रस्ते अपघातांची संख्या कमी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शमा पवार म्हणाल्या, रस्ते अपघाताचे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक नियमावलीचा प्रत्येकाने अंगिकार करावा. आपली सुरक्षा आपल्याच हातात असून पादचारी व वाहनचालक या दोघांनीही याचे भान राखणे गरजेचे आहे.
दीपाली काळे म्हणाल्या, युवा पिढी देशाचे भावी आधारस्तंभ असून, रस्ते सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावर आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे प्रत्येकाने पुढे वर्षभर पालन करणे आवश्यक आहे.
यावेळी संजय नवले, श्री. तिरणकर यांनी मार्गदर्शन केले. अमोल घुले यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेची शपथ दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. जेवूरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रियांका माने यांनी केले. अमरसिंह गवारे यांनी आभार मानले.
रस्ते अपघातातील जखमी व्यक्तिंना मदत केल्याबद्दल श्रीमती कांता मच्छिंद्र गुंड यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी आशुतोष नाटकर आणि त्यांच्या पथकाद्वारे रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्याविषयी पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, अन्य शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, मोटर ड्रायव्हिंग स्कूल, ऑटोरिक्षा संघटना, पीयुसी सेंटर यांचे प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments