भाजपाच्या मिशनला अजित पवारांकडून टोला
मुंबई (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात मिशन-४५, आणि मिशन-२००, इतकेच का, त्यापेक्षा त्यांनी मिशन-४८ आणि मिशन-२८८ ठरवून घ्यायला हवे त्यांना शुभेच्छा आहेत असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज येथे लगावला.
विधानभवन वार्ताहर दालनात विरोधी पक्षनेते पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली होती.याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांचे संदर्भात हिवाळी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाबाबत तसेच इतरही प्रश्नांवर भाष्य केले.याप्रसंगी भाजपच्या वतीने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन-४५ आणि विधानसभेसाठी मिशन-२००,बाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली होती.तेव्हा भाजपने मिशन-४८, आणि मिशन-२८८च जाहीर करायला हवे माझ्या त्यासाठी शुभेच्छा आहेत असे सडेतोड उत्तर त्यांनी दिले.
छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते या विधानावर ठाम आहोत असे स्पष्ट करताना अजित पवार म्हणाले,मला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. स्वराज्यरक्षक या शब्दांत रक्षण, समाज, संस्कृती,धर्म या सर्वांचा अंतर्भाव होतो.त्यांच्या लोकांनी महापुरुषांबद्दल जी अवमानजनक वक्तव्ये केली त्यावरून लक्ष उडविण्यासाठी ते आपल्या विरोधात आंदोलने करत आहेत. जेव्हा हे वक्तव्य झाले तेव्हा कोणी बोलले नाही. त्यानंतर त्यांच्यापैकी जे ठरवितात त्यांचा आदेश आला आणि आंदोलने सुरू झाली.शरद पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत त्यांनी केलेले विधानावर आपले काही म्हणणे नाही.मात्र स्वराज्य रक्षक ही उपाधी संभाजी महाराजांनाच देता येईल अन्य कोणाला नाही. ज्यांना पटेल त्यांनी स्विकारावे ज्यांना नाही त्यांनी सोडून द्यावे.वडूज येथे संभाजी महाराज स्मारकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर भूमीपूजन करावे असे आवाहनही त्यांनी केले.
पवार यांनी यावेळी कोणी कोणाशी युती आघाडी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे उत्तर एका प्रश्नाला दिले. प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्यास आपला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यातील प्रत्येक घटकाने जागावाटपात वाट्याला आलेल्या जांगांतून आपापल्या मित्रपक्षांना जागा द्याव्या ही आमची भूमिका आहे.
0 Comments