सोलापूरात मश्रूम गणपती मंदिराचा 14 लाखाचा सोन्याचा कळस चोरीला
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशभर गणेशोत्सव साजरा केला जात असतानाच सोलापुरातील प्रसिद्ध मश्रूम गणपतीचा सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. यामुळे भाविक संतप्त झाले आहेत. सोलापूर – तुळजापूर महामार्गावर हिप्परगा येथे असलेल्या मश्रुम गणपतीच्या मंदिरावरील सोन्याचा कळस बुधवारी (ता. 31) पहाटे चोरीला गेला. या कळसाची अंदाजे किंमत 14 लाख रुपये आहे.
मश्रूम गणपतीचा 25 किलो वजनाच्या सोन्याचा कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे मंदिरात आल्याने चोरी झाल्याचे समजले. दरम्यान, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून भेट देऊन पाहणी केली. या मंदिरावरील कळस चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.
सोलापूर जिल्ह्यात असलेले हिप्परगामधील हे मश्रूम गणपतीचे मंदिर सिद्धरामेश्वरांनी स्थापन केले आहे. नंतरच्या काळात भाविकांनी मिळून या गणेश मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. त्याचवेळी गणपती मंदिरावरही सोन्याचा कळस लावण्यात आला होता.
हिप्परगा गावामध्ये रोडलगत मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरावर भाविकांच्या योगदानातून २४ तोळे सोन्याचा कळस बसवण्यात आला होता. मंदिराच्या वरच्या बाजूला चढून चोरट्यांनी हा कळस चोरला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची मंदिरासमोर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर सोलापूर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. डॉग स्कॉड मागविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू करायला सुरूवात केली. या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीही पोलिसांकडून करण्यात येत आहे. याच मंदिरावरील कळस २०१६ साली चोरीला गेला होता. आता पुन्हा कळस चोरीला गेल्याचे मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
तक्रारीनुसार, संजय पतंगे हे मश्रूम मंदिराचे पुजारी असून ते देखरेख देखील करतात. 30 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन ते घरी गेले. मंगळवारी मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी श्री मश्रूम गणपती मंदिरावरील स्थापित असलेला अंदाजे 25 किलो वजनाचा पंचधातूचा कळस चोरीला गेला.
मंदिरावरील कळस चोरीला गेल्याने आरोपींना तातडीने अटक करुन कडक कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे. मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसऱ्यांदा कळस चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment