आधुनिक वजन काट्याच्या जमान्यात पारंपरिक मापन पद्धतीची परिमाणे विलुप्त होण्याच्या मार्गावर

बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): पुर्वीच्या काळात आपले सर्वांचे पूर्वज आपल्या दैनंदिन जीवनातील देवाणघेवाणीच्या व्यवहारात प्रामुख्याने त्या त्या काळातील बारा बलुतेदारांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संसाधनांचा वापर करत होते. बलुतेदारी च्या त्या काळात आर्थिक व्यवहार कमी प्रमाणात चालत असे त्यामुळे त्या त्या काळात या बारा बलुतेदारांकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या परस्पर देवाणघेवाणीतून आपापले व्यवहार होत असत. उदाहरणार्थ जे लोक शेती करुन आपापल्या शेतात विविध प्रकारची धान्य पिकवून ते धान्य देऊन आपल्याला उपजीविकेसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू त्या धान्याच्या मोबदल्यात घेत असत.
शेतकरी वर्ग आपापल्या शेतात निर्माण केलेले सदरचे धान्य मोजण्यासाठी निर्माण करण्यात आलेली तांब्या पितळेची, बांबू, वेत, लाकडापासून, कापडा पासून तयार केलेली तत्कालीन मोजमापाची मापटी तथा परिमाणे म्हणजे त्या त्या ठिकाणच्या स्थानिय बोलीभाषेतील चिळवं, निळवं,कोळवं, चिपटं, मापटं, शेर, आडडसरी तथा टिपरी, निठवे, आदोली, पायली, फरा, आदमण, मण, खंडी इत्यादी प्रकारची अचूक मोजमापे सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या यांत्रिक युगात काही ठराविक ठिकाणी अपवाद वगळता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. असे म्हटल्यास वावगं वाटायला नको.
त्यामुळे कधीकाळी आपल्या पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात वापरलेल्या तसेच त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिलेल्या या विलोभनीय अनमोल सांस्कृतिक ठेव्याचा किंबहुना तत्कालीन साधन सामुग्रीचा समाजाला विसर पडताना दिसून येत आहे. सदर पारंपरिक मोजमापांच्या परिचया पासून सद्याच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या यांत्रिक युगात तथा विविध आकारातील विविध प्रकारच्या साध्या आणि इलेक्ट्रॉनिक तराजूंच्या जमान्यात वावरत असलेली चतुरस्र नवतरुण पिढी अनभिज्ञ होताना दिसून येत आहे. हे पाहून प्रत्येक सर्जनशील मनाला खेद वाटल्या शिवाय राहत नाही.
No comments:
Post a Comment