गावच्या विकासकामांसाठी सत्ताधारीच झाले आक्रमक

हर घर तिरंगा उपक्रमाची ग्रामसभा वेगळ्या विषयाने चर्चेत
लऊळ (कालीदास जानराव):- येथील हर घर तिरंगा उपक्रमासाठी आयोजित करण्यात आलेली विशेष ग्रामसभा वेगळ्याच विषयाने गाजली.सभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी पार्टीतील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी गावची अर्धवट असलेली व नवीन विकासकामे कधी सुरू करणार असा प्रश्न उपस्थित करत सरपंच व ग्रामसेवकास धारेवर धरले.आम्हाला लोकांनी मतदान केलंय,लोकं आम्हाला विचारतात त्यांना काय उत्तर देऊ?असा खडा सवाल ग्रामपंचायत सदस्य कल्याण गाडे,पवन भोंग यांनी केला.तुम्ही नेहमीच गावातील नागरिकांच्या समस्येवर बोलता वस्तीवर राहणारे लोक या गावचे नागरिक नाहीत का अशी विचारणा देखील वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी केली.सत्ता येऊन दीड वर्ष झाले तरीदेखील गावची विकासकामे सुरू का करत नाही अशी विचारणा ग्रामसेवकांना केली असता सरपंचाची परवानगी नव्हती असे सांगितले.सरपंच प्रतिनिधी प्रशांत बोडके यांनी सर्व विकासकामे फ्लॅश करा असे सांगत विकासकामांची यादीच ग्रामसेवकांना वाचायला सांगितले.ग्रामसेवक विजय माढेकरांचे यादी वाचन संपताच ही तर सर्व गावातील कामे आहेत वस्तीवर काय?अशी विचारणा करत वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी साधक बाधक मात्र चर्चा करण्यात आली.
विशेष ग्रामसभेला फक्त चार ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती
हर घर तिरंगा या उपक्रमासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेला सत्ताधारी पार्टीचे चार सदस्य उपस्थीत होते.विरोधी पार्टीतील एकही सदस्य उपस्थीत राहिला नाही.सभागृहात विकासकामांचा विषय सुरू असताना काही सदस्यांनी तेथून काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment