बहुमत असेल तर सरकार अधिवेशन घ्यायला का घाबरतंय? - अजित पवार

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात सध्या अतिवृष्टीचे संकट ओढावले असून शेतकरी संकटात सापडला आहे. या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पालकमंत्री असणे आवश्यक आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला तरी दोनच मंत्री काम करत आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा अपमान असून सरकारने तातडीने अधिवेशन बोलावून अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे पवार म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही 18 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर 25 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता 25 जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे? असा सवाल अजित पवार त्यांनी उपस्थित केला.
तसेच, मुख्यमंत्री अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करणार आहेत. पण त्यांनी अधिवेशन घेतले तर राज्याच्या विविध भागातील आमदार आपापल्या मतदारसंघातील माहिती देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment