मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना न्यायालयाने फटकारले

मुंबई, (नासिकेत पानसरे)- शिवसेनेशी बंडखोरी करीत सत्तेवर आलेल्या सर्वसामान्यांच्या सरकारला मुंबई उच्चन्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावाकडील भागात शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हॅलिपॅड आहेत. त्यावर आक्षेप नाही मात्र विद्यार्थ्यांसाठी रस्तेही बनवायला हवेत. असे मत न्यायालयाने मांडले आहे. ही परिस्थिती बदलण्याची माफक अपेक्षा आहे.असे न्यायालयाने म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील खिरवंडी या दुर्गम भागातील गावातील काही मुलींचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला होता. विद्यार्थ्यांच्या या संघर्षाची उच्च न्यायालयाने दखल घेत या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याबाबत न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात दोन हेलिपॅड असल्याचे वृत्त नुकतेच वाचले. मात्र त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणणे नाही. परंतु त्यांच्या भागातील शाळेत जायला विद्यार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. त्या विद्यार्थ्यांसाठी रस्तेही बनवायला हवेत, अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलावीत आणि कायमस्वरूपी मार्ग काढावा असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शिवाय बैठकीनंतर मुख्य सचिव त्यांच्या मतासह या प्रकरणातील प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा अहवाल तयार करतील. हा अहवाल ३० ऑगस्टपर्यंत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव पदाच्या अधिकाऱ्याच्या प्रतिज्ञापत्रासह न्यायालयात सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
No comments:
Post a Comment