निवडणूक अटळ : सहाव्या जागेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांवर शिवसेना भाजपची मदार

मुंबई (नासिकेत पानसरे): राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेतली नसल्याने सहाव्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची आशा संपुष्टात आली आहे.सहावी जागा निवडून येण्यासाठी आता शिवसेनेला आणि भाजपला छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून रहावे लागणार आहे.सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपात थेट लढत होणार असल्याने अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचा भाव वधारला असल्याचे चित्र आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे.शिवसेना २,भाजप ३ आणि दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी पर्यंत मुदत होती.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून भाजपच्या उमेदवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.मात्र भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी माघारी घेण्याच्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत अटळ आहे.राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप आमने सामने आल्याने या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे महत्व वाढले आहे.विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे १६ आमदार आहेत.राष्ट्रवादीचे ५३ आमदार असून,माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत.सध्या विधानसभेत शिवसेनेचे ५६ आमदार होते.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या ५४ वर आली आहे.विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या सोमवारी अपक्ष आमदारांची वर्षावर बैठक बोलावली आहे.या बैठकीला किती अपक्ष आमदार उपस्थित राहतात यावर शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.
विधानसभेत बहुजन विकास पक्ष ३, समाजवादी पार्टी २,एमआयएम २, प्रहार जनशक्ती पक्ष २,मनसे १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( मार्क्सवादी) १,शेतकरी कामगार पक्ष १, स्वाभिमानी पक्ष १, राष्ट्रीय समाज पक्ष १, जनसुराज्य शक्ती पक्ष १.क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, असे छोट्या पक्षांचे एकूण १६ आमदार आहेत.तर विधानसबेत १३ अपक्ष आमदार आहेत.अपक्षांपैकी मंजूळा गावीत,चंद्रकांत पाटील,आशिष जैसवाल,नरेंद्र भोंडेकर,किशोर जोरगेवार,गीता जैन.संजय शिंदे आणि राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मदत करण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदारांचे पाठबळ आहे.तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे अपक्ष आमदार भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर प्रकाश आवाडे,राजेंद्र राऊत, महेश बादली,विनोद आग्रवाल आणि रवी राणा हे भाजपला मदत करण्याची शक्यता आहे.मनसेचे एकमेव आमदार असून,मनसे भाजपला मदत करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळे भाजपकडे 113 आमदारांचे पाठबळ आहे.त्या या निवडणुकीत तुरूंगात असलेले दोन आमदार आणि एमआयएमचे दोन आमदार यांच्या मतावर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही पक्षांना तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत.भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी अधिकच्या 13 अधिक मतांची तर शिवसेनेला 14 मतांची गरज असेल.
0 Comments