महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांत मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी

मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशात मान्सूनचे आगमन झाले असताना महाराष्ट्रात उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. राज्यातील जनता पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्याने मागील चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवार पर्यंत येऊन थांबला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झाल्याने मान्सून कर्नाटकच्या सीमेवर थबकल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र असे असले तरी पुढील पाच दिवसांत राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह इतर काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये पोहोचेल असे हवामान विभागाने भाकीत केले होते.
मात्र, अचानक हवामानात बदल झाल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कारवारमध्ये रेंगाळला आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सून साठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे.
पश्चिम बंगालच्या काही शहरांसह, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मान्सूननं धडक दिली आहे. याशिवाय, मेघालयमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कर्नाटक, केरळ, लक्षद्विप, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या काही भागात पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment