पंढरपूरसाठी अतिरिक्त 100 एसटी बसेस
.png)
पुणे (कटूसत्य वृत्त):- एसटी महामंडळाने यावर्षी पंढरपूरसाठी अतिरीक्त 100 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता या अतिरिक्त बसेस पुणे विभागातून सोडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर राणवरे यांनी दिली.
पायी वारीत करोनामुळे सलग दोन वर्षे खंड पडला. एसटी शिवशाही बसने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. यावर्षी शासनाकडून आषाढी वारीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त 425 ते 430 बसेस सोडण्यात येतात. यावर्षी संख्येत वाढ करण्यात येणार आहे. पुणे विभागातून 530 बसेस सोडण्याचे नियोजन आहे. यावर्षी आषाढी एकादशी 10 जूलै रोजी आहे. त्यामुळे 6 जूलैपासूनच स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या स्थानकांतून बसेस सोडण्यात येणार आहे.
दरवर्षी ग्रामीण भागातून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. बऱ्याचवेळा भाविकांना एसटी बससाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. यावर्षी भाविकांना ग्रुप बुकिंगची सुविधा असणार आहे. त्यामुळे भाविकांना त्यांच्या गावावरूनच पंढरपूरला जाता येणार आहे. त्यासाठी एसटीचे आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.
24 जूनला सासवड ते पुणे
पुण्यातून सासवडला 24 जून रोजी पालखी मार्गस्थ होणार आणि त्या दिवशी पालखी सासवड मुक्कामी असणार आहे. दरवर्षी पुण्यातून सासवडपर्यंत पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे सासवड ते पुणे या मार्गावर 150 बसेसचे नियोजन आहे. सासवडहून पुण्यात परतणाऱ्या नागरीकांसाठी कोणतीही अडचण येणार नाही.
श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा 20 जून रोजी आणि श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 21 जून रोजी मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी पुणे विभागातून 17 ते 24 जूनदरम्यान आळंदी ते देहू या मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment