हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिल्याबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

मुंबई, (कटुसत्य वृत्त): नाफेडकडून राज्यात सुरु असलेल्या हरभरा खरेदीला मुदतवाढ दिल्याबद्दल भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. डॉ. अनिल बोंडे यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नाफेडने 23 मे पासून हरभरा खरेदी बंद केली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. या संदर्भात किसान मोर्चाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी संपर्क साधला.
केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवून खरेदीला मुदत वाढ द्यावी तसेच खरेदीचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत 30 मे रोजी कृषि मंत्रालयाने पत्रक काढून हरभरा खरेदीसाठी 18 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर हरभरा खरेदीचा लक्ष्यांक 6.89 लक्ष मेट्रिक टन वरून 7.76 लक्ष मेट्रिक टन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल किसान मोर्चा मोदी सरकारचे अभिनंदन करत आहे, असेही डॉ. बोंडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment