अल्पसंख्याक विभागाच्या सर्व उपक्रमांना गती द्या - अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या सूचना
%20(1).jpg)
सोलापूर, (कटुसत्य वृत्त): अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विविध विभागाच्या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना देणे आवश्यक आहे. या योजनांना गती देण्याच्या सूचना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी दिल्या.
श्री. अभ्यंकर हे सोलापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी नियोजन भवन येथे अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजना आणि त्यांची अंमलाबजावणी याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी सदस्य आर. डी. शिंदे, किशोर मेढे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दिपाली घाटे यांच्यासह अल्पसंख्याक महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. अभ्यंकर यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने कमी कालावधीमध्ये अंगणवाडी, शाळा येथे पोहोचून नऊ लाख मुलांची तपासणी केली. हा उपक्रम स्तुत्य असून राज्याला प्रेरणादायी आहे. प्रत्येक विभागाने अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समाजाला द्यावी. प्रत्येक विभागाने सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना संपर्क करून त्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी बैठक घ्यावी.
जिल्ह्यातील मदरशांची माहिती घेऊन त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा. मदरशा आपोआप पुढे येणार नाहीत, ज्यांची नोंदणी वक्फ बोर्डाकडे आहे, त्यांना मदत देणे आवश्यक आहे. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण देणे महत्वाचे आहे. मदरशातील मुलांना करियरनुसार इंग्रजी व इतर कौशल्य शिक्षणासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
अल्पसंख्याक मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठी प्रयत्न करावेत. शिष्यवृत्तीच्या कागदपत्रासाठी खर्च जास्त अशी परिस्थिती असल्याने शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेची प्रचार, प्रसिद्धी करावी. गरजू आणि कर्जाची परतफेड करणाऱ्या व्यक्तीला रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार उमेदवारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून 15 टक्के अल्पसंख्याक समाजातील महिलांना 10 हजार रुपये फिरता निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही श्री. अभ्यंकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी विविध विभागांच्या आढाव्याची माहिती दिली.
0 Comments