द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन या विषयावरील चर्चासत्राचे निमगाव(टे) येथे आयोजन


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथिल विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाच्या ठिकाणी रविवार०१ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांचे "द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन" या विषयावरील मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.निशांत देशमुख हे देखील “द्राक्ष उत्पादनामध्ये सूर्यप्रकाशाचे महत्त्व” यावर मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती प्रकल्पाचे अध्यक्ष धनराज शिंदेनी दिली.
दरवर्षी द्राक्ष बागेतून शाश्वत उत्पादन मिळविण्यासाठी चांगल्या प्रतीची सूक्ष्म घडनिर्मिती होणे जरुरीचे असते. या अनुषंगाने प्रत्येक वेलीवर जास्तीत जास्त फलधारीत काड्याची निर्मिती झाल्यास चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळू शकते. त्याकरिता शेतकर्यांनी खरड छाटणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असते. तसेच छाटणी केल्यानंतर अन्न्द्रव्ये व्यवस्थापन,सिंचन व्यवस्थापन आणि संजीवकांचा वापर या बाबीचे शास्त्रशुद्ध नियोजन होणे आवशयक असते. तसेच वाढत्या तापमानाचा बागेवरती होणारा परिणाम व त्यावरील उपाययोजना आदी समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील सर्व द्राक्ष बागायतदारांनी या “शेतकरी संवाद” कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनराज शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment