Hot Posts

6/recent/ticker-posts

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी

 गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी

सांगोला तालुका भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


सांगोला ( कटुसत्य वृत्त ) :- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. परमवीरसिंग यांचं पत्र धक्कादायक असून राज्यातील सरकार खंडणीखोरांच, हप्ते वसुलीचे असल्याचे सिद्ध करण्याचा विडाच उचलला आहे. या प्रकरणामुळे राज्याची बदनामी झाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगोला तालुका भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

         मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी एक 8 पानाचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील 1750 बार, हॉटेल व इतरांकडून दोन-तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. या सोबतच अनेक धक्कादायक खुलासे आणि आरोप परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हप्ते वसुलीमुळे राज्यातील पोलिसांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, जगात दोन नंबरवर असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अशा यावरून एकच गोष्ट लक्षात येते की, आघाडी सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. या भ्रष्ट सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा न दिल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

     सदरचे निवेदन सांगोला तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शहराध्यक्ष आनंद फाटे, नवनाथ पवार, मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, ओंकार कुलकर्णी, दीपक केदार, राहुल केदार, बिरा शिंगाडे, सिद्धेश्वर गाडे, समाधान केदार, नंदू मेटकरी, शरद गावडे आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments