Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी रस्त्याची दुरावस्था

 सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी रस्त्याची दुरावस्था



नागरिकांसह वाहनधारकांचे प्रचंड हाल
नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
रस्त्याचे बजेट कागदोपत्री मंजूर रस्ता कामाला मुहूर्त लागेना

तुळजापूर दि.१०(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) ते पांगरदरवाडी या तीन किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. अपघातामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व आले असून अनेकजन मणक्याच्या दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत. वारंवार रस्त्याची मागणी करुनही रस्ता केला जात नसल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

सांगवी (काटी) पांगरदरवाडी हा तीन किलोमीटरचा रस्ता वीस वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने मधुन तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले असुन वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळणासाठी हा प्रमुख मार्ग असल्यामुळे येथील नागरिकांची नियमित या रस्त्यावर वर्दळ असते .बँक, पोलिस स्टेशन इत्यादी महत्वपूर्ण कामासाठी येथिल नागरिकांना या रस्त्यावरुन ये-जा करावे लागते. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात झाले आहेत. गरोदर महिलांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे पांगरदरवाडीची बस सेवा गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे. यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्याकडे लक्ष  देऊन तात्काळ रस्ता करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

बजेट मंजूर कामाला मुहूर्त मिळेना
पांगरदरवाडी-सांगवी (काटी) या नवीन रस्त्याच्या कामासाठी बजेट मंजूर होऊन तीन-चार वर्षाचा कालावधी उलटला असला तरीही अद्याप या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहत्या पाण्यामुळे सिमेंटपूल निखळला
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महार्गावरून सांगवी (काटी) पांगरदरवाडी या गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुलावरून नियमित पाणी वाहत असते. पाण्यामुळे प्रत्येकवर्षी वारंवार वरील गावांचा संपर्क तुटतो. वाहत्या पाण्यामुळे पूल निखळला असून पुलावरची खडी उखडली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पूल कमजोर झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments