१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात |

मुंबई, दि.३(क.वृ.): कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवावी असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.
प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो.
३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स
होम आयसोलेशनमध्ये बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहावे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने राहणे सुरक्षित आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत., असे श्री. टोपे यांनी सांगितले.
0 Comments