गवळींच्या 'सिंगम' कामगिरीने मोकाट फिरणाऱ्यांची होतेय 'दांडी गुल'
संचार बंदीत सैराट होवून फिरणाऱ्याची वाहनेच होत आहेत, "लॉक डाऊन"
लॉक डाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल--पो.नि. राजेश गवळी
सांगोला (जगन्नाथ साठे):- सध्या जग कोरोना या विषाणूच्या प्रचंड सावटाखाली आहे.दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. या मुळे एका बाजूला प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना सांगोला तालुक्यातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता,बिनधास्तपणे वागताना दिसत आहेत,देश लॉक डॉऊन मध्ये असताना आणि राज्यात संचार बंदी असताना विनाकारण,आणि मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना,वाहन चालकांना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलाच धसका घेतल्याचे चित्र सांगोला शहर आणि तालुक्यात दिसू लागले आहे.
पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत असलेल्या सिंघम कामगिरीने मोकाट,विनाकारण,दुचाकी आणि चारचाकी वाहनातून सैर मारणाऱ्याची चांगलीच दांडी गुल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे, महाराष्ट्रात संचारबंदी कायदा लागू असताना आणि सांगोला नगरपालिका,पोलीस स्टेशन,तहसिल कार्यालय,आरोग्य विभागाने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती सर्व जनजागृती करून "Stay Home चा सल्ला देत असताना वरील सर्व प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून विनाकारण आणि दुचाकी चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्याची वाहनेच गेली तीन दिवस पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लॉक डॉउन करीत असल्याने अनेक वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यात जमावबंदीचे आदेश जुगारून पान टपऱ्या चालू ठेवणाऱ्या १३ पान टपऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनाकारण रस्त्यावरून सैर मारणाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करून जप्त करण्यात आली आहे. आणि ही कारवाई सोलापूर जिल्हयात लक्षवेधी ठरत आहे.विनाकारण घराबाहेर पडून,मॉर्निंग वॉक करिता आलेल्या,गर्दी करून गप्पा मारणाऱ्या ,सोशल डिस्टन्स न ठेवता रस्त्यावरून फिरणाऱ्या ५७६ इसमाच्या विरोधात ४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, वरील सर्व कामगिरी सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या आदेशानव्ये पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सिंघम स्टाईलने केली आहे.
मुळातच १०२ गावामध्ये शांतता,सुव्यवस्था ठेवण्यासाठी ज्या प्रमाणात पोलिसांचे संख्याबळ पाहिजे,ते प्रमाण कमी असून फक्त ९० पोलिस आणि ६ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सांगोला पोलीस स्टेशन कार्य करीत आहे. अपुऱ्या संख्या बळ असताना गवळी यांनी केलेल्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजेश गवळी यांनी पंढरपूर येथे असताना जशी शहराला शिस्त लावली होती, तशाच पद्धतीचा दरारा त्यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलने सांगोला तालुक्यात निर्माण केला आहे.इंदिरानगर झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांनी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने केलेली मदत नक्कीच सामाजिक बांधिलकी जोपासणारी आहे.आणि हे सर्व कार्य करताना सांगोल्याचे तहसिलदार योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी संतोष राऊत,तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमणी,नगरपालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे,ग्रामीण रुगणालयाच्या प्रभारी पूजा साळे या अधिकाऱ्यां बरोबर सलोख्याचे संबंध ठेवून कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक सर्वसामान्यांतून होताना दिसत आहे.


0 Comments