मुंबई : मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला केलं. कोरोनासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साठा देखील आहे. घाबरुन जाऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जनतेला धीर दिला. कृपा करा, गर्दी कमी करा, अनावश्यक प्रवास टाळा आणि वर्क फ्रॉम होम करा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. हे व्हायरस विरोधात युद्ध आहे. तुम्ही सहकार्य करावे ही माझी अपेक्षा आहे. तुम्ही घर सोडू नका, बाहेर जाऊ नका पण डॉक्टर्स, नर्सेस हे त्यांचं घर सोडून तुमच्यासाठी काम करत आहेत, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करुन दिली. अनावश्यक प्रवास तरीही होत आहे. आपल्याकडे केसेस वाढत आहे. काळजी घ्यावी लागणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.हा विषाणू हळूहळू पावलं पुढे टाकत आहे. आपण त्याला थोपवत आहोत. आपल्याकडचे रुग्ण बाहेरुन आलेले आहेत. अनावश्यक असेल तर घरातून अजिबात बाहेर पडू नका, बस, रेल्वेमधील गर्दी आणखी कमी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.बाहेरच्या देशातून जे लोक येत आहेत ते आपलेच आहेत. सगळ्यांनी सुरक्षित राहावे. दिलेल्या सूचना पाळाव्यात. हातावर quarantine स्टॅम्प मारलेले लोक इथे-तिथे फिरत आहेत. आपली travel history लपवत आहेत, हे योग्य नसल्याचंही ते म्हणाले.
कोरोना हे एक युद्ध आहे. आपल्याकडे पुरेशा गोष्टी आहेत. आपण घाबरु नका, सरकार तुमच्यासोबत आहे. युद्धाचा आनुभव फार वाईट असतो. पण युद्धासाठी आम्ही सज्ज आहोत, पण यंत्रणेवरील भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे. यंत्रणा सांभाळणारी हीसुद्धा माणसंच आहेत. कळत नकळत त्यांच्या मनातही धोका आहेच, पण तो धोका पत्करुन ते 24 तास काम करत आहेत. सरकारकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत, त्या पाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करणार, असं त्यांनी आश्वासन दिले आहे. ज्या सूचना सरकारने दिल्या आहेत, त्या पाळा. सर्वधर्मियांना विनंती आहे, हे संकट जातपात-धर्म यांच्या पलिकडचे आहे. एकजुटीने लढूयात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
महात्मा फुले, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे महामंडळावरील अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द
महाविकास आघाडी नव्याने नियुक्त्या करणार
मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, यांसह जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती, व्यसनमुक्ती समिती आदींच्या अध्यक्ष, संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून महाविकास आघाडी सरकार या सर्व महामंडळ/ समित्यांच्या अध्यक्ष, संचालकांच्या नव्याने नियुक्त्या करणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
या शासन निर्णयाद्वारे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक विजयकर यांच्यासह मुंबई, नागपूर विभागासह सर्व संचालकांच्या नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांचीही नियुक्ती याद्वारे रद्द करण्यात आली आहे.या सर्व नियुक्त्या रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, लवकरच विभागामार्फत नव्याने या नियुक्त्या करण्यात येतील असेही विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
जादूटोणा विरोधी, व्यसनमुक्ती, दिव्यांग हक्क समित्याही रद्द..
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या जादूटोणा विरोधी अंमलबजावणी, प्रचार व प्रसार समिती, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती समिती, दिव्यांग व्यक्ती हक्क सल्लागार मंडळ, या सर्व समित्याचे अध्यक्ष, सदस्य या सर्व नियुक्त्याही स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आल्या असल्याचे विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
पूर्वी नियुक्त केलेल्या या सर्व महामंडळे व समित्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आल्या असून, विभागाच्या योजना व जबाबदाऱ्यांची चोख व प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी या सर्व पदी नव्या नेमणूका करण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातर्फे म्हटले आहे.

No comments:
Post a Comment