आमदार सचिन कल्याणशेट्टी; दुधनी बाजार समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- कृषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असून, शेतकऱ्यांच्या कष्टाला त्यांच्या शेतीमालातून योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी बाजार समितीने प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सिद्धाराम बाके, तर उपसभापतिपदी निंगप्पा पुजारी यांची निवड झाली. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, संचालक मंडळाने नवी जबाबदारी स्वीकारून शेतकरी बांधवांच्या हितासाठी भरीव काम करावे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ, योग्य भाव आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच बाजार समितीच्या माध्यमातून त्यांच्या विविध अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे. बाजार समितीच्या कारभारातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, यासाठी संचालक मंडळाने प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य विकास बुळ्ळा, सिद्धाराम शिवमूर्ती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, यशवंत तात्या धोंगडे, महेश हिडोळे, प्रवीण शहा, शिवशरण जोजन, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, महादेव पाटील, अमोल हिप्परगी, रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment