महामार्गावर १० मिनिटांत रुग्णवाहिका न पोहोचल्यास १० हजारांचा दंड
नवी दिल्ली (कटुसत्य वृत्त) : महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आपत्कालीन मदत यंत्रणेबाबत कठोर नियम लागू केले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संबंधित रुग्णवाहिका १० किलोमीटरच्या परिसरातून १० मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थेला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
महामार्गांवरील अपघातांमध्ये ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असल्याने जखमींच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन NHAI ने आपत्कालीन मदत व्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी ‘NHAI Care System’ अंतर्गत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या प्रणालीअंतर्गत महामार्गावरील रुग्णवाहिका, क्रेन आणि पेट्रोलिंग वाहनांवर जीपीएस तसेच विशेष अँड्रॉइड उपकरणांच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय डॅशबोर्डवरून या वाहनांच्या हालचालींचे थेट निरीक्षण केले जाईल. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच जवळचे आपत्कालीन वाहन तातडीने घटनास्थळी पाठवणे शक्य होणार आहे.
नियमांनुसार, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १० किलोमीटरच्या अंतरातील रुग्णवाहिकेने १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. निर्धारित वेळेत सेवा न दिल्यास संबंधित सेवा पुरवठादारावर आर्थिक दंडाची कारवाई केली जाणार आहे.
NHAI च्या या निर्णयामुळे महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होणार असून, विलंबामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वाची ठरण्याची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment