देशातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा १२.७ टक्के अधिक कैदी; महाराष्ट्रात १४३.९ टक्के, दिल्लीत सर्वाधिक गर्दी
राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती; ६०९ तुरुंग निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक भरलेले
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त): देशातील तुरुंगांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याचे वास्तव केंद्र सरकारने राज्यसभेत मांडले. २०२४ अखेर देशातील तुरुंगांची एकूण क्षमता ४ लाख ५३ हजार ७६९ कैद्यांची असताना, ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रत्यक्षात ५ लाख ११ हजार ५४२ कैदी तुरुंगात होते. त्यामुळे देशातील तुरुंगांमध्ये ११२.७ टक्के व्यापन (Occupancy Rate) असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो (एनसीआरबी)च्या आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, देशातील ६०९ तुरुंग त्यांच्या मंजूर क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांनी भरलेले आहेत.
महाराष्ट्रातही तुरुंगांवर ताण
आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील तुरुंगांची क्षमता २७,११० कैद्यांची असताना प्रत्यक्षात ३९,००३ कैदी तुरुंगात होते. त्यामुळे राज्यातील तुरुंगांचे व्यापन १४३.९ टक्के झाले आहे. तर देशातील सर्वाधिक गर्दी दिल्लीतील तुरुंगांमध्ये असून तेथील व्यापन दर १९४.६ टक्के असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
तुरुंग व्यवस्थापन राज्यांच्या अखत्यारीत
केंद्रीय गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी सांगितले की, कैद्यांचे अधिकार, आरोग्य सेवा, कायदेशीर मदत, पुनर्वसन आणि तुरुंगांचे दैनंदिन व्यवस्थापन हे विषय प्रामुख्याने राज्य सरकारांच्या अधिकारक्षेत्रात येतात.
तुरुंग व्यवस्थापन सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मानक नियमावलीबरोबरच आदर्श तुरुंग नियमावली-२०१६ सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आली असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment