‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमले बार्शी शहर
भाजप व युवा मोर्चाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बार्शी (कटूसत्य वृत्त) : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि तिरंग्याप्रती सन्मानाची भावना जागविण्यासाठी भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा, बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी बार्शी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक विजय राऊत आणि भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली उत्साहात पार पडली.
‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण बार्शी शहर दुमदुमून गेले. तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या शौर्याला सलाम करणे, तसेच देशाची एकजूट, सामर्थ्य आणि राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये जागृत करणे हा या तिरंगा रॅलीचा प्रमुख उद्देश होता.
रॅलीची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर रोड येथून झाली. त्यानंतर बाजार समिती, पोस्ट चौक, जुने पोलीस स्टेशन, पांडे चौक, शिवसृष्टी, तानाजी चौक, बेदराई चौक, हांडे गल्ली आणि पंचायत समिती मार्गे रॅली शहीद स्मारक येथे पोहोचली. शहीद स्मारक येथे अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष बबन गडदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमोल डिसले, पप्पू हनुमंते, रोहित लाकाळ यांच्यासह भाजपा व भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment