पाच वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांची हृदयस्पर्शी जीवनगाथा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

पाच वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांची हृदयस्पर्शी जीवनगाथा

 पाच वर्षे मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांची हृदयस्पर्शी जीवनगाथा





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- "एका घरातील स्त्री निघून जाते, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होत नाही; तर त्या घरातील प्रेम, माया, आपुलकी, आधार आणि जगण्याचा एक मोठा आधारच हरपतो." या भावनेचा प्रत्यय टेंभुर्णी येथील जगताप कुटुंबाला आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतरही जिद्दीने मृत्यूशी सामना करणाऱ्या स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांचे शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी सांगली येथील उषःकाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जगताप कुटुंबावरच नव्हे, तर त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर शोककळा पसरली आहे.
रुपाली (काकी) यांना सुमारे पाच वर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते. हा आजार गंभीर असला तरी त्यांनी कधीही जगण्याची उमेद सोडली नाही. पती अनिल जगताप यांनीही प्रत्येक संकटात त्यांची खंबीर साथ दिली. नियमित उपचार, औषधे, डायलिसिस आणि वैद्यकीय सल्ला यामुळे त्यांनी अनेक कठीण प्रसंगांवर मात केली.
या संपूर्ण काळात सांगली येथील उषःकाल हॉस्पिटलचे डॉ. मुंजाप्पा यांनी अत्यंत जिव्हाळ्याने आणि समर्पित भावनेने उपचार केले. कुटुंबीयांच्या मते, त्यांच्या प्रयत्नांमुळे रुपाली (काकी) यांचे आयुष्य अनेक वर्षे वाढले. त्यामुळे आजही जगताप कुटुंब डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

मात्र दि. २४ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री अचानक त्यांना फिटसदृश झटका आला आणि प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉ. राहूल पाटील, डॉ. प्रसाद मोरे, डॉ. आमोल माने आणि मदत कांबळे यांनी त्वरित उपचार करून सिटीस्कॅन केले. या तपासणीत मेंदूमध्ये पाणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारांसाठी त्यांना सांगली येथील उषःकाल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

उषःकाल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुरू केले. सागर भाऊ खोत यांनी तातडीने रक्तदाते यांना बोलावून 16 जनांचे रक्त दान केले मात्र दीर्घकाळ चाललेल्या किडनीच्या आजारामुळे शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम झाला. किडन्यांनी पूर्णपणे काम करणे बंद केले आणि त्याचा परिणाम हृदयावरही झाला. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. क्रिएटिनिनची पातळी ३.०४ वरून ९ पर्यंत वाढल्याने प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. साध्या डायलिसिसऐवजी अत्याधुनिक पद्धतीने डायलिसिस करण्यात आले. त्यामुळे क्रिएटिनिनचे प्रमाण काहीसे कमी झाले, मात्र हृदयाची कार्यक्षमता सुधारली नाही.
शनिवारी दुपारी मेंदूतज्ज्ञ डॉ. संजीव कुलकर्णी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीत होते. परंतु त्याआधीच रक्तदाब आणि हृदयाची गती अचानक कमी झाली. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण नियतीपुढे वैद्यकीय विज्ञानही हतबल ठरले आणि सायंकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी रुपाली (काकी) यांनी अखेरचा श्वास घेतला.
रुपाली (काकी) यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा होता. कोणत्याही व्यक्तीला प्रेमाने आपलेसे करणे, घरातील प्रत्येकाला सांभाळून घेणे आणि संकटातही चेहऱ्यावर हसू ठेवणे, ही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्या केवळ आपल्या कुटुंबातच नव्हे, तर नातेवाईक आणि मित्रपरिवारातही सर्वांच्या लाडक्या "काकी" म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्यांच्या पश्चात पती अनिल जगताप, दोन मुली आकांक्षा व अंकिता, मुलगा ओंकार, आई, थोरले बंधू महादेव जगताप, त्यांचा परिवार आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
एका आईच्या जाण्याने मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार हरपतो. आईची माया, तिचा स्पर्श, तिचे प्रेम आणि तिचे मार्गदर्शन याची जागा कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. मुलांच्या प्रत्येक यशामागे आणि प्रत्येक अश्रूमागे आईच उभी असते. आज आकांक्षा, अंकिता आणि ओंकार यांच्या आयुष्यात ही मायेची सावली कायमची हरपली आहे.
पत्नी ही नवऱ्याच्या आयुष्यातील केवळ जोडीदार नसते; ती त्याच्या प्रत्येक स्वप्नाची, प्रत्येक संघर्षाची आणि प्रत्येक यश-अपयशाची साक्षीदार असते. तब्बल २१ वर्षांचा संसार करताना रुपाली (काकी) यांनी प्रत्येक संकटात आपल्या पतीची खंबीर साथ दिली. त्यांच्या जाण्याने अनिल जगताप यांच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कोणत्याही गोष्टीने भरून निघणे अशक्य आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे प्रेम, त्यांचे त्याग आणि त्यांचा संघर्ष हेच आता या कुटुंबाची अमूल्य ठेव आहे.
स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांचा संघर्ष, त्यांचे धैर्य, त्यांचा कुटुंबावरील जिव्हाळा आणि त्यांनी जपलेली माणुसकी कायम स्मरणात राहील. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर स्व. सौ. रुपाली (काकी) अनिल जगताप यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि जगताप कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages