"पोलीस मला कानात सांगत होते सरकार बदला"; राहुल गांधींचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- दिल्लीत झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावेळी तरुणांना पोलिसांनी अमानुष मारहाण केली. यापार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं.
मोर्चात कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारलं गेलं याचे व्हिडिओ दाखवले. तसंच विरोधीपक्षांच्यावतीनं तीन महत्वाच्या मागण्या केल्या. विशेष म्हणजे मोदी सरकारवर हल्लाबोल करत हे सरकारच बदला असं माझ्या कानात पोलिसांनी सांगितल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.
राहुल गांधी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून देशातील विद्यार्थ्यी हे आंदोलन करत आहेत. त्यांच्या मनात राग आहे पण ते शांततेत आंदोलन करत आहेत. याचे तीन प्रमुख कारणं आहेत, आपल्या शिक्षण पद्धतीची जगात चर्चा असायची आता हीच शिक्षण पद्धती घोटाळ्यांची शिक्षण पद्धती झाली आहे. पण ही व्यवस्था किती सडली आहे हे कोणालाही माहिती नाही. कारण गेल्या दहा वर्षात १५२ पेपर लीकच्या घटना घडल्यात, पण नेमक्या किती हे अद्याप माहिती नाही. तसंच ज्यांच्याजवळ पैसा आहे ४०-५० लाख रुपये ज्यांच्याजवळ आहे ते पेपर खरेदी करु शकतात. त्यामुळं तुमच्या इमानदारीचा, मेहनतीला काहीही महत्व राहिलेलं नाही. साडेसात कोटी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांचं या पेपरलीकनं नुकसान केलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पेपर लीक झाले पण गेल्या दहा वर्षात एकाही व्यक्तीला शिक्षा झाली नाही.
तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे, शिक्षणानंतर जे व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही इंजिनिअर, डॉक्टर, वकील झाले त्यानंतर देशाची जबाबदारी असायला हवी की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, रोजगार देऊ, भविष्य देऊ. देशाचा अर्थ हाच असतो. पण देश काय म्हणतो तर आम्ही तुमच्याकडून पैसा घेणार, शिक्षण व्यवस्था बिघडवणार आणि त्यानंतर हात झटकणार. त्यानंतर एकच दरवाजा तुमच्यासाठी खुला राहिल तो म्हणजे सरकारी नोकरी. हा पण बरबटलेला आहे ज्याच्याजवळ पैसा आहे तो तिथं घुसणार.
राहुल गांधींच्या तीन मागण्या
या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आज जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत ते जास्त काही मागत नाहीत तर त्यांच्या काय मागण्या आहेत. त्यांपैकी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यांची जबाबदारी निश्चित करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व कारणांसाठी नम्रपणे विद्यार्थ्यांची माफी मागावी. या तीन मागण्या यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केल्या.
पोलिसांनी कानात सांगितलं...
कालच्या आंदोलनात पोलिसांनी मला ओढून नेलं हे खरं आहे. पण पोलीस माझ्या कानात म्हणत होते की, या सरकारला हटवा. मी राजस्थानचा आहे, मी हरयाणाचा आहे यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घातली आहे, पण यांना हटवा. त्या बिचाऱ्यांना केवळ आदेश पाळायचे असतात तर ते करतात. पण जंतर-मंतरवर जे काही झालं हे या पोलिसांनाही आवडलेलं नाही. जे संवेदनशील पोलीस आहेत त्यांना हे आवडलेलं नाही त्यांना वाटतंय की जे विद्यार्थ्यांसोबत झालं तो एक प्रकारे गुन्हा घडलेला आहे. कारण त्यांनाही माहिती आहे त्यांचीही मुलं या आंदोलनात आहेत.

No comments:
Post a Comment