अभिनव संस्थेचा सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने समाज कल्याण केंद्र, रंगभवन येथे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा मीनलताई दास यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यास सोलापूर शहरासह पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मीनलताई दास म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अठरापगड जाती-धर्मातील मावळे एकत्रितपणे कार्यरत होते. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या समतावादी विचारसरणीतून प्रेरणा घेऊन विविध जाती-धर्मातील युवक-युवतींना एकत्र आणण्यासाठी या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सुमारे ५० युवक-युवतींची नोंदणी करण्यात आली. यामध्ये वकील, अभियंते, कंत्राटदार, उद्योजक, पदवीधर तसेच विविध क्षेत्रांतील उच्चशिक्षित युवक-युवतींचा समावेश होता. तसेच मोठ्या संख्येने पालकांनीही उपस्थित राहून मेळाव्याला प्रतिसाद दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शामभैय्या कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर गोरे, अभिनव संस्थेच्या जिल्हा उपाध्यक्षा सरोजिनी माकाई, जिल्हा संघटक अनिता वाघमारे, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, शहराध्यक्षा जयश्री राणसरजे, शहर उपाध्यक्षा सुनीता कारंडे, अर्चना अधटराव, प्रकाश कोळी, जिल्हा संघटक विशाल साळुंके, पंढरपूर तालुक्यातील रोहित फावडे, शिरीष जगदाळे, उत्तर तालुका अध्यक्ष विक्रम वानकर, शहर उद्योग आघाडीचे संतोष सुरवसे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्याच्या माध्यमातून विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याने सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

No comments:
Post a Comment