उजनीतील पाणी उपसण्यावरही निर्बंधांची शक्यता; बॅकवॉटर परिसरातील कृषिपंपांना केवळ दोन तास वीजपुरवठा?
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. भीमा नदीकाठच्या परिसराप्रमाणेच उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील कृषिपंपांनाही २४ तासांत केवळ दोन तास वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही राज्यात मान्सूनची अपेक्षित प्रगती झालेली नाही. हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कोकण व दक्षिण महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासाला विलंब होत असून पावसाबाबतची अनिश्चितता कायम आहे.
राज्यातील अनेक धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उजनी धरणातील पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार भीमा नदीकाठच्या भागातील कृषिपंपांना दिला जाणारा वीजपुरवठा आधीच २४ तासांत केवळ दोन तासांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे सिंचनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पावसाअभावी पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू असताना वीजपुरवठ्यातील कपातीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातून हजारो शेतकरी कृषिपंपांच्या माध्यमातून पाणी उपसा करतात. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या पाणी उपशामुळे धरणातील साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागातील कृषिपंपांनाही केवळ दोन तास वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून जलसाठा संरक्षणाला प्राधान्य दिले जात असले तरी या निर्णयाचा सिंचन व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर प्रशासन आणि शेतकरी यांच्यात व्यापक चर्चा होण्याची चिन्हे आहेत.

No comments:
Post a Comment