सोलापूर (कटूसत्य वृत्त) : माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण वाहन अपघाताची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, घटनेच्या सखोल चौकशीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष एस. कार्तिकेयन यांनी विशेष चौकशी समिती गठित केली आहे.
या समितीमार्फत अपघातस्थळासह रस्त्यालगतच्या धोकादायक आणि संरक्षक भिंतीविना असलेल्या उघड्या विहिरींचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक सुधारात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
समितीकडून अपघातामागील नेमकी कारणे शोधण्याचे काम केले जाणार आहे. रस्त्याच्या रचनेतील त्रुटी, वाहनाचा वेग, तांत्रिक बिघाड अथवा इतर संभाव्य कारणांचा तपशीलवार तपास केला जाणार आहे. चौकशी अहवाल जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर करण्यात येणार असून त्याआधारे आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई केली जाईल.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांच्या कडेला असलेल्या धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
समित्यांना दिलेले प्रमुख निर्देश :
रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण करून यादी तयार करणे.
संबंधित विहीर मालक अथवा प्राधिकरणास संरक्षक भिंत, लोखंडी जाळी व रिफ्लेक्टर बसविण्याचे आदेश देणे.
आदेशांचे पालन न करणाऱ्या निष्काळजी मालमत्ताधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे.
अपघातप्रवण ठिकाणांची स्वतंत्र नोंद करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यालगतच्या धोकादायक ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment