करमाळा (कटूसत्य वृत्त) : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीवरील जाचक अटी व शर्ती रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी तसेच निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केली.
विनाअट शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी बोलताना फरतडे यांनी शासनाच्या शेतकरीविषयक धोरणांवर टीका केली. २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२६ मध्ये केवळ ५० हजार रुपयांपर्यंत मर्यादित लाभ देणे आणि उर्वरित कर्जाची संपूर्ण परतफेड करण्याची अट घालणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
३१ मार्च २०२५ पर्यंतची सर्व थकीत पीक कर्जे व मुदत कर्जे सरसकट कर्जमाफीमध्ये समाविष्ट करावीत, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास मोर्चा व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख शाहूराव फरतडे, अविनाश गाडे, शहाजी धेंडे, नवनाथ सूर्यवंशी, लिंगेश्वर गोमे, बालाजी वाडेकर, ज्ञानदेव लोंढे, मयूर तावरे, ओंकार कोठारे, विनोद पाटील, नागेश माने, दीपक वावरे, त्र्यंबक पवार, लक्ष्मण थोरात, दिगंबर काटुळे, भाऊ मस्तुद आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment