शीर्षक : मांगी तलावाच्या पाण्यावरून जनक्षोभ; हळगावला पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात रास्ता रोको
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे शेतकऱ्यांचा तीव्र जनक्षोभ पाहायला मिळाला. सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि हजारो शेतकऱ्यांनी अहिल्यानगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांगी बसस्टॉपसमोर रास्ता रोको आंदोलन करत शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.
'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' आणि 'मांगी तलावातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने संबंधित जीआर तात्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
शासनाने मांगी तलावातील पाणी हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या तलावातच पाण्याची टंचाई असताना आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होत नसताना हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी किंवा पाणी बचाव संघर्ष समितीशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
पाणी प्रश्न पेटला!
'रक्त सांडू पण पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही,' असा निर्वाणीचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी शासनाला दिला. पाण्याच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पाण्याचे गणित आणि शेतकऱ्यांचे आक्षेप
आंदोलकांनी यावेळी तलावातील पाण्याच्या उपलब्धतेचे गणित मांडले. तलावातील २० टक्के पाणी करमाळा एमआयडीसीसाठी तर २५ टक्के पाणी पिण्याच्या गरजांसाठी आरक्षित आहे. उर्वरित पाण्यावर सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्राचे सिंचन अवलंबून असून २ हजार हेक्टर क्षेत्र उचल सिंचनाखाली येते. अशा परिस्थितीत तलावात अतिरिक्त पाणी उपलब्ध नसताना पाटबंधारे विभागाने हळगावला पाणी देण्यास परवानगी कशी दिली, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
या आंदोलनात मराठा सेवा संघाचे सचिन काळे, सुजित बागल, अजय बागल, संतोष वारे, शिवशंकर जगदाळे, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे, प्रशांत बागल यांच्यासह मांगी पंचक्रोशीतील २२ गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:
Post a Comment