कर्जमाफीतील अटी रद्द करा, दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची मागणी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- विनाअट कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच या मागण्यांसाठी २९ जून रोजी संभाजीनगर येथे मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सोमवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, विनाअट कर्जमाफीच्या मागणीसाठी २६ शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ६५ तासांनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारने कर्जमाफी योजनेला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले असले तरी त्यामध्ये घालण्यात आलेल्या कडक अटी-शर्तींमुळे मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे कर्जमाफीतील जाचक अटी तत्काळ रद्द करून दुष्काळ जाहीर करावा आणि मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाशिक विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार यांनी भाजपवरही टीका केली. दिल्लीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ मिळत असले तरी महाराष्ट्रातील भाजपचे काही नेते त्यांच्याविरोधातच राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच बँकिंग व्यवस्थेतील अनेक प्रश्न सरकार इच्छाशक्ती दाखविल्यास एका दिवसात सोडवू शकते, असा दावा करत केंद्र आणि राज्य सरकार गुजरात व आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांना मोठे करण्याच्या धोरणावर भर देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार फोडून त्यांना अडचणीत आणण्यात आले, तर मित्रपक्षांच्या नेत्यांनाही राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका करत भाजप हा कोणाचाही खरा मित्र नसल्याचा टोला रोहित पवार यांनी लगावला.

No comments:
Post a Comment