आषाढी वारीचे हायटेक नियोजन; वारकऱ्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही - सीईओ कुशल जैन
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- पंढरपूर आषाढी वारीसाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा सर्वंकष आणि हायटेक नियोजन करण्यात आले असून वारकऱ्यांना कोणतीही उणीव अथवा गैरसोय भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षांतील त्रुटींचा अभ्यास करून यंदाच्या वारीसाठी सूक्ष्म स्तरावर नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी अधिकमासामुळे अनेक भाविकांनी यापूर्वीच श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले असले तरी मानाच्या संतांच्या पालख्यांसोबत पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य उशिरा सुरू होणारा पावसाळा, वाढणारी गर्दी आणि वारकऱ्यांच्या सुविधा लक्षात घेऊन मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.
वारी मार्गावरील स्वच्छतेला यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. लाखो वारकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वच्छतागृहांची संख्या ३० टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. तसेच स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी निवडक ठिकाणी जर्मन हँगर उभारण्यात येणार असून, लांब पल्ल्याचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचा शारीरिक थकवा दूर करण्यासाठी मसाज सेंटरची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अधिक आरामदायी वातावरण मिळणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असून लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित, स्वच्छ आणि सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून यंदाची वारी अधिक यशस्वी करण्याचा संकल्प केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment