बार्शी (कटूसत्य वृत्त) : बार्शी तालुक्यातील मानेगाव (धा.) येथे जुन्या घराच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सुरुवातीला मारहाणीचा असलेला गुन्हा आता अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मानेगाव (धा.) येथे जुन्या घराच्या मालकी व वापराबाबत सुरू असलेल्या वादातून सुरज धनाजी माने याने सिद्धेश्वर माने व त्यांचा भाऊ अजित माने यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद विकोपाला गेल्यानंतर सुरज माने याने लोखंडी शॉकपसरने दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात अजित माने यांच्या डोक्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने वैराग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील सीएनएस रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच ७ जून २०२६ रोजी अजित माने यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृत्यू झाल्यामुळे गुन्ह्यातील कलमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मारहाणीच्या घटनेने घेतला जीवघेणा वळण
सुरुवातीला घराच्या वादातून झालेली मारहाण अखेर एका युवकाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने कौटुंबिक वाद किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील नेमकी कारणे आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.

No comments:
Post a Comment