विजयरावांच्या आग्रहखातिर उड्डाण पुल केलं मंजूर
आ. विजयकुमार देशमुखांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सोलापूरच्या उड्डाण पुलासाठी अभिवचन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय मानल्या जाणाऱ्या जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत भावनिक आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत हे काम लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली. सोलापूर दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात बोलताना विजयराव यांच्या आग्रहखातिर उड्डाण पुल केल मंजूर. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष कौतुक करत, “विजयरावांनी या प्रकल्पासाठी खूप संघर्ष केला आहे. त्यांना दिलेला शब्द मी नक्की पाळणार,” असे ठाम विधान केले.
गडकरी म्हणाले की, सोलापूर शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अनेक मोठे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मात्र, उड्डाण पुलाच्या कामात जमीन संपादन आणि अंतिम प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण झाले. महाराष्ट्र शासनाने आवश्यक जमीन मंजूर केली असली तरी त्याला अद्याप अंतिम क्लिअरन्स मिळालेली नसल्याने प्रकल्प रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी गडकरी यांनी प्रामाणिकपणे कबुली देताना सांगितले की, “या प्रकल्पात कुणाचाही दोष नाही. पण त्यावेळी लँड अॅक्विझिशनची प्रक्रिया शासन खात्यात योग्य पद्धतीने पूर्ण झाली असती, तर हे काम आतापर्यंत पूर्ण झाले असते. ही माझी चूक मानतो.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
तसेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण परदेशी यांनी नगरोथान योजनेअंतर्गत विशेष निधी निर्माण करून या उड्डाण पुलासाठी आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन दिले होते, अशी माहितीही गडकरी यांनी दिली. “आता हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार असून, सोलापूरकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल,” असे ते म्हणाले.
सोलापूरसाठी एक लाख कोटींची विकासकामे
सोलापूर जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली तब्बल एक लाख कोटी रुपयांची विकासकामे पुढील पाच वर्षांच्या आत पूर्ण करण्याचा निर्धारही गडकरी यांनी व्यक्त केला. रस्ते, उड्डाण पूल, सेवा रस्ते, भुयारी मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून सोलापूरला राज्यातील महत्त्वाचे लॉजिस्टिक आणि औद्योगिक केंद्र बनविण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर–सोलापूर चौपदरीकरणासाठी ११०० कोटी
अहमदनगर–सोलापूर–करमाळा–टेंभुर् णी या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी तब्बल ११०० कोटी रुपयांची निविदा निश्चित झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, नगर आणि मराठवाड्याकडून सोलापूरकडे होणारी वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाण पुलाच्या खर्चात मोठी वाढ, जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाण पुलासाठी सुरुवातीला सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, कालांतराने बांधकाम साहित्याचे वाढलेले दर, तांत्रिक बदल आणि प्रशासकीय विलंब यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च तब्बल १००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे गडकरी यांनी सांगितले. “निधी वाढल्याचे दुःख आहे, पण विकासकामे थांबविणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
.png)
.png)
No comments:
Post a Comment