अशैक्षणिक कामांच्या ओझ्याखाली शिक्षक; शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) :- सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप आणि शिक्षकांवर टाकल्या जाणाऱ्या अवाजवी अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील बहुतांश प्रश्न शेवटी सरकारी व्यवस्थेकडेच येऊन थांबतात. त्यामुळे ही व्यवस्था मुळापासून सक्षम केल्याशिवाय शिक्षणाचे भवितव्य उज्ज्वल होणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले.
मंगळवेढा महोत्सव अंतर्गत ‘शिक्षण : काल, आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शनिवार, दि. २ मे रोजी यशवंत मैदान, इंग्लिश स्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. प्रियदर्शनी महाडीक होत्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. महाडीक म्हणाल्या की, भारतात शिस्त हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. जपानप्रमाणे प्रभावी शिस्तीच्या पद्धती आपल्या शिक्षण प्रणालीत समाविष्ट करण्याची गरज आहे. ब्रिटिशकालीन शिक्षण पद्धतीत अपेक्षित बदल झालेले नाहीत. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असूनही त्यावर देशात कमी आणि परदेशात अधिक संशोधन होत आहे, ही खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे हीच प्राथमिकता असली पाहिजे.
या कार्यक्रमास म.सा.प. जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे, पद्माकर कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, सहसचिव श्रीधर भोसले, डॉ. मीनाक्षी कदम, प्रा. तेजस्विनी कदम, अजिता भोसले, रामचंद्र नेहरवे, अॅड. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे व गोरिमा शेख यांनी केले, तर आभार अश्पाक काझी यांनी मानले.

No comments:
Post a Comment