अक्षता पडण्याआधीच पोलिसांची धडक; माळेवाडीत बालविवाह उधळला
श्रीपूर (कटूसत्य वृत्त) :- माळशिरस तालुक्यातील माळेवाडी-बोरगाव येथे अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह ऐनवेळी रोखण्यात अकलूज पोलीस स्टेशन च्या निर्भया पथकाला यश आले आहे. मंडप सजून अक्षता टाकण्याची वेळ जवळ आली असतानाच पोलिसांनी धडक कारवाई करत विवाह सोहळा थांबवला.
अकलूज पोलीस ठाणे हद्दीत बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाला २ मे रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे ३ मे रोजी निर्भया पथक प्रमुख करिश्मा बगवे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल रविराज नागरगोजे यांनी संबंधित विवाहस्थळी अचानक भेट दिली.
यावेळी नवरी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तपासाअंती मुलीचे वय १६ वर्षे ४ महिने १४ दिवस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ विवाह सोहळा थांबवत संबंधित मुलगी, नवरदेव आणि त्यांच्या पालकांना पुढील चौकशीसाठी अकलूज पोलीस स्टेशन येथे आणले.
पोलिसांनी उपस्थितांना बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच मुलींच्या शिक्षणावर भर देणे, त्यांना स्वावलंबी बनविणे किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती यांच्यासमोर हजर करण्यात आले असून समितीच्या आदेशानुसार मुलीची बालगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके तसेच पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
No comments:
Post a Comment