शक्तीपीठ’ महामार्ग सरकारच्या फायद्याचा; शेतकऱ्यांनी एकजूट होऊन विरोध करावा – राजू शेट्टी
करकंब (कटूसत्य वृत्त) :- प्रस्तावित ‘शक्तीपीठ’ महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास जलद व आरामदायी होईल, असे सरकारकडून सांगितले जात असले तरी हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून मोठ्या कंपन्या, सत्ताधारी नेते व संबंधित घटकांच्या फायद्याचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या महामार्गाला कडाडून विरोध करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
करकंब येथील श्री कनकंबा माता मंदिरात ‘जन आक्रोश आंदोलन’च्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, “या शक्तीपीठ महामार्गामागे मोठ्या शक्ती कार्यरत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे या प्रकल्पाचे मुख्य सूत्रधार आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवली पाहिजे. अनेकांनी मोठ्या कर्जातून शेती विकसित केली आहे. अशा परिस्थितीत जमीन जाणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा फटका आहे.”
मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी एकजूट राहण्याची शपथ घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राहून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी संघटनेनेच आतापर्यंत साथ दिल्याचे सांगत पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पंढरपूर, सांगोला, जत, कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या या महामार्गाला यापूर्वीही संघटनेने विरोध केला होता. त्यामुळे मार्गात बदल करावा लागल्याचा दावा शेट्टी यांनी केला. तसेच काही दलालांकडून जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला.
या मेळाव्यास शिवाजी पाटील, तानाजी बागल, सचिन पाटील, युवा अध्यक्ष अमरसिंह कदम, सचिन अटकळे, रणदिवे, सिद्धेश्वर घुगे, बाहुबली तावरे, बापू गायकवाड, नितीन बागल, शरद पांढरे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश व्यवहारे यांनी केले, तर आभार शरदचंद्र पांढरे यांनी मानले.

No comments:
Post a Comment